18/08/2026
"पाणी द्या, नाहीतर सत्तेच्या खुर्च्या खाली करा!" | सिडकोच्या खोट्या आश्वासनांविरोधात नागरिकांचा संताप
नवी मुंबईतील तळोजा येथील 'आसावरी सोसायटी'तील नागरिकांचा पाण्यासाठीचा आक्रोश आता थेट सिडको भवनाच्या दारावर पोहोचला आहे. हक्काच्या पाण्यासाठी रहिवाशांनी रस्त्यावर उतरून सिडको प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
आंदोलनातील मुख्य मुद्दे:
२४ तासांचे स्वप्न, पाणी मात्र ४-८ दिवसांतून १० मिनिटे: नागरिकांच्या म्हणण्यानुसार, २४ तास पाणी देण्याचे खोटे आश्वासन देऊन ५ वर्षे फसवले गेले. प्रत्यक्षात ४ ते ८ दिवसांनंतर केवळ १० मिनिटेच पाणी मिळते.
टॅक्स वेळेवर, मग सुविधा का नाही?: सिडको भाडेवाढ आणि प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर आकारते; एका दिवसाचा विलंब झाल्यास दंड आकारला जातो, पण मूलभूत पाणी पुरवठा वेळेवर का होत नाही?
पाणी विकत घेण्याची वेळ: पिण्यासाठी ₹७० ची बाटली व जार विकत घ्यावे लागत असून घरगुती वापरासाठीही पाणी शिल्लक राहत नाही. पावसात छतावरून गळणारे पाणी गोळा करून वापरण्याची नामुष्की महिलांवर ओढवली आहे.
घरांच्या चाव्या घ्या, पैसे परत करा: "घरांचे स्वप्न दाखवून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या सिडकोची घरेच आता नकोत, घरांच्या चाव्या परत घ्या आणि आमचे पैसे व्याजासकट परत करा," असा निर्वाणीचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
पाणीपुरवठ्याचा प्रश्न त्वरित मार्गी लागला नाही, तर सिडको भवनातच मुक्काम ठोकण्याचा इशारा संतप्त महिला आंदोलकांनी दिला आहे.