17/04/2026
वल्लरी मीडियाद्वारे प्रस्तुत आणि वल्लरी प्रकाशनाद्वारे प्रकाशित ‘गुलबक्षी’ या बाविसाव्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे समारंभपूर्वक प्रकाशन रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झाले. पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वि.का.राजवाडे सभागृहात संपन्न झालेल्या या समारंभासाठी संग्रहात सहभागी महाराष्ट्रातील विविध शहरातून कवी-कवयित्री उपस्थित राहिले होते. यामध्ये सुरेखा मिसाळ (पुणे), रत्नाकर खरोटे (जळगाव), माधवराव देशमुख (नांदेड), प्रितम गाडगीळ (मुंबई), तुषार देशमुख (ठाणे), रेखा बारी (धुळे), पूजा बोटे (कोल्हापूर), अर्चना पाटील (अलिबाग), डॉ. चैताली भिडे (मुंबई), पौर्णिमा चिकणे (मुंबई), निर्मला गिरासे (धुळे) अशा अकरा कवी-कवयित्रींचा समावेश होता. यावेळी सह्याद्री नॅशनल स्कूलचे विद्यार्थी आर्या जगदाळे, गणेश कळसे आणि माया कल्याणकर यांनीही कवितांचे सादरीकरण केले. समारंभाचे सूत्रसंचालन प्रज्ञा कल्याणकर यांनी केले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कवयित्री कांचन सावंत, वल्लरीच्या संपादकीय सल्लागार मानसी चिटणीस आणि यशदाचे अधिकारी व्यंकटेश कल्याणकर होते.
यावेळी बोलताना महाळंक म्हणाल्या, ‘‘मनात दाटलेले कागदावर उमटते तेव्हा रिते वाटते, हे रितेपण समाधान घेऊन येते, ही अनुभूती कविता लिहिल्यावर येते. उत्तम काव्याची निर्मिती होण्यासाठी परिश्रम घ्यायला हवेत, मनाची चांगली मशागत व्हायला हवी.’’
महाळंक पुढे म्हणाल्या, ‘‘कविता हे व्रत आहे. कवीच्या अंतरंगात, मनात उमटणारा भावनांचा उत्स्फूर्त, सशक्त अविष्कार म्हणजे कविता होय. गेल्या काही वर्षात कवींचे पीक आले आहे, असे सातत्याने म्हटले जाते, पण या कवींमध्ये किती कस आहे हे तपासून पाहायला हवे. येत्या काळात स्वत:ला कवी म्हणवणाऱ्या प्रत्येकाने अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे.’’
कांचन सावंत म्हणाल्या, ‘‘स्वत:चे भावविश्व रसिकांसमोर उलगडणे म्हणजे कविता सादर करण्याची प्रक्रिया होय. कविता लिहिणाऱ्यांनी शब्दांच्या पलिकडचे वाचायला शिकले पाहिजे. यमकाचा अभ्यास, छंद, शब्द, लय यांचे भान कवीला असायला हवे. रियाजाने कविता चांगली होत जाते, त्यामुळे कवितेचा रियाज आवर्जून करायला हवा.’’
मानसी चिटणीस यांनी कविता संग्रहाची प्रक्रिया सांगून कवितांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संपादिका प्रज्ञा कल्याणकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरती परळकर, प्रीती पोथरकर यांनी परिश्रम घेतले.