24/04/2026
आज सकाळी एका पालक आईचा फोन आला. तिचा प्रश्न साधा होता,
“सर, शाळेला सुट्टी लागलीये का?”
मी तिला सांगितले,
“पेपर संपले असले तरी काही मुलं शाळेत येतात. पुस्तकं वाचतात. खेळ खेळतात. ती आली तरी चालेल.”
मी हे असं सांगितलं कारण ती मुलगी शाळेपासून दूर अंतरावर वस्तीवर राहते. शाळा दूर असल्यामुळे तिला आणणे-नेणे यात काही अडचण असू शकते, असे मला वाटले.
दरम्यान, आई मुलीला दरडावून म्हणत होती,
“उठ, शाळेत जायचं आहे.”
आई बोलतच राहिली,
“अहो सर, ही घरी असली की सदा ना कदा सतत मोबाईलवर पडलेली असते. गेम खेळती, रील्स बघती... सारखं हेच सुरू असतंय. खाण्या पिण्याचीही शुद्ध राहत नाही. एकदा मोबाईल हातात घेतला की तो सोडत नाही हिला. जसं गुळाच्या ढेपेला मुंगळा लागला की मुंडकं तुटलं तरी तो गुळ सोडत नाही, तशीच हिची अवस्था झालीये. मी म्हणते तुम्ही पोरांना सुट्टीच देऊ नका.”
तिनं फोन ठेवला. मी थोडा वेळ वाट पाहिली, पण मुलगी शाळेत आली नाही. पुन्हा फोन करावा का असा विचार मनात आला; पण आपण फोन केला तर मुलीला आणखी त्रास होईल, असे वाटले. म्हणून थांबून घेतलं. उद्या शाळेतच पालक आणि मुलीसोबत समोरासमोर बोलून घ्यावं, असं ठरवलं.
लवकरच सुट्टी सुरू होणार आहे त्यामुळं हा प्रश्न अधिक उग्र रूप धारण करणार आहे. मोबाईल दिला नाही तर मुलं प्रचंड अस्वस्थ होतात. चिडचिड करतात. आदळआपट करतात. हिंसक होतात. ब्लॅकमेल करतात. थोडक्यात मुलांना नकार पचवण्याची सवय राहिली नाही. मोबाइल हातात दिला तरी अडचण आणि नाही दिला तरी त्रास होतो.
'मोबाईलच्या या वाढत्या व्यसनाचं काय करायचं?'
हा आज बहुसंख्य पालकांसमोर उभा ठाकलेला यक्षप्रश्न आहे...
मुलांना मोबाइल वेडापासून परावृत्त करायला तुम्ही पालक म्हणून काय करता किंवा तुम्ही पालक नसलात तरी जाणकार म्हणून काय सुचवाल हे नक्की लिहा. इतरांना मार्गदर्शन होईल.
#पालक #विद्यार्थी #उन्हाळ्याची_सुट्टी
#मोबाइल #सुटी #शाळा #शिक्षण #व्यसनं
Copy paste by Bhausaheb chasker