21/05/2026
ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी
(जन्म :२१ मे, १९२८ – मृत्यू :२३ डिसेंबर,२०१०)
मराठी साहित्यविश्वात पत्रकार, संपादक, लघुकथा लेखक, कादंबरीकार आणि चरित्रकार म्हणून ठसा उमठवणारे नाव म्हणजे ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी. २१ मे १९२८ रोजी जोगेश्वरी, मुंबई येथे जन्मलेले नाडकर्णी हे अस्सल मुंबईकर. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची झेप स्थानिक नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेली होती.
नाडकर्णी यांचे लेखन क्षेत्र हे अनेक अंगांनी बहरलेले होते. ‘पाऊस’, ‘भरती’, ‘चिद्घोष’, ‘प्रस्थान’ हे त्यांच्या लघुकथासंग्रहांमधून मानवी मनाच्या बारकाव्यांचे अत्यंत संवेदनशील दर्शन घडते. ‘दोन बहिणी’, ‘कोंडी’, ‘नजरबंदी’, ‘वलयांकित’ या त्यांच्या कादंबऱ्या आजही विचारांना चालना देणाऱ्या आहेत.
ते केवळ कल्पक लेखक नव्हते, तर एक कुशल चरित्रकारही होते. एम. एफ. हुसेन, पिकासो, गायतोंडे, डी. डी. दलाल, हिचकॉक यांसारख्या दिग्गजांवरील त्यांच्या चरित्रात्मक लेखनात गहन अभ्यास आणि समज जाणवते. ‘अनवाणी’ हे हुसेन यांच्यावरील पुस्तक विशेष गाजले.
साहित्याबरोबरच कलासमीक्षा हे त्यांच्या लेखनातील एक महत्त्वाचे अंग. ‘अश्वत्थाची सळसळ’, ‘अभिनय’, ‘प्रतिभेच्या पाऊलवाटा’, ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप’ या त्यांच्या समीक्षा ग्रंथांनी मराठी आणि इंग्रजी वाचकांना विचारप्रवृत्त केलं.
हुसेनसारखे कलाकारही त्यांचा सल्ला मानत. त्यांच्या कलासमीक्षेचा सुवर्णमहोत्सव जहांगीर आर्ट गॅलरीत साजरा करण्यात आला, आणि त्यावेळी हुसेन यांनी स्वत:चे अमूल्य चित्र त्यांना भेट दिले. त्यांच्या लिखाणात स्पष्टता, परखडपणा आणि वैचारिक सखोलता होती कुठलाही संकोच नव्हता.
नाडकर्णी यांनी एम.ए. (इंग्रजी) पूर्ण केल्यानंतर १९५१ मध्ये लंडनच्या भारतीय हायकमिशनमध्ये नोकरी स्वीकारली. परंतु मातृभूमीची ओढ त्यांना परत घेऊन आली. १९५६ पर्यंत त्यांनी मुंबईत महाविद्यालयांमध्ये इंग्रजीचे अध्यापन केले. त्यानंतर चार वर्षे त्यांनी जाहिरात क्षेत्रात कॉपीरायटर म्हणून काम केले.
‘तुकाराम शेंगदाणे’ या टोपणनावाने त्यांचे लिखाण प्रसिद्ध होऊ लागले आणि त्यांच्या कथा ‘मौज’सारख्या नियतकालिकांतून झळकू लागल्या. त्यांनी इंग्रजी पत्रकारिताही उत्तम केली.
नाडकर्णी यांच्या लेखन व समीक्षेला देशविदेशात मान्यता मिळाली. फ्रेंच सरकारने १९८६ मध्ये त्यांना ‘अक्षरांचे शिलेदार’ या किताबाने सन्मानित केले, तर ब्रिटिश सरकारने १९९४ मध्ये त्यांना गौरवचिन्ह बहाल केले. हे पुरस्कार त्यांच्या कलाजाणिवा आणि लेखनसमृद्धीचे प्रमाण होते.
आपल्या अठराव्या वर्षी सुरू झालेली लेखनयात्रा त्यांनी तब्बल ६४ वर्षे अखंड चालू ठेवली. त्यांचे लेखन, समीक्षा, भाष्य हे केवळ विचारप्रवर्तक नव्हे, तर काळाच्या पुढे जाणारे होते. त्यांनी चित्रकला, नाटक, साहित्य आणि चित्रपट यांच्यावर केलेले लेखन आजही मार्गदर्शक ठरते.
२३ डिसेंबर २०१० रोजी या प्रतिभाशाली लेखकाने जगाचा निरोप घेतला. पण त्यांची प्रतिभा, त्यांचे विचार, त्यांचे शब्द आजही वाचकांच्या मनात जिवंत आहेत.
ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ