12/06/2021
खरा दुर्गसेवक ही पोस्ट share केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही .....
हौसे-मौजेच्या पाळण्यात राजगडाच्या 'दुर्गमपणाची' अवहेलना नको...!
● राजगड हा अतिशय उंच.त्याची उंची पाहता तो सर्व किल्ल्यांमध्ये श्रेष्ठ आहे. त्याचा घेर 12 कोसांचा .त्याच्या उंचीची व मजबुतीची कल्पनाच करवत नाही. या डोंगरातील द-याखो-यातून आणि घनदाट अरण्यातून कोणीही फिरू शकत नाही. अपवाद फक्त वारा आणि पावसाच्या पाण्याचा. किल्ल्याच्या तटाखाली भयंकर द-या आणि त्यांतून जाणा-या अवघड वाटा आहेत. तेथून माणूस जाणे केवळ अशक्य आहे. - साकी मुस्तैदखान आपल्या मासिरे आलमगिरीमध्ये लिहितो.
● " या किल्ल्याचे मी वर्णन तरी कसे करू ?काय या किल्ल्याची उंची! काय त्याचा विस्तार. जणू काही आकाशच पसरले आहे. त्याचे उंचच उंच टोक पाहून छातीच दडपते.त्याच्या प्रचंड वजनामुळे सर्व पृथ्वीचा भार सहन करणारा पाताळातील वृषभ नेहमीच ओरडत असावा. राजगड किल्ला म्हणजे जणू डोंगरांचीच रांग.त्याला सगळीकडून वेढा घालणं केवळ अशक्य. त्याचा घेर तब्बल बारा कोसांचा.. - महंमद खाफीखान
●" राजगड हा डोंगरी किल्ला अभेद्य आहे. मावळ्यांचा पुढारी शिवाजी याला राज्यविस्तारासाठी त्याचा भरपूर उपयोग झाला.... - जेम्स डग्लस.
खाफीखान,मुस्तैदखानासारख्या शत्रूंनाही ज्या किल्ल्याच्या दुर्गमतेचा धाक आणि दरारा वाटत होता असा हा राजगड.ज्या किल्ल्याच्या उंचीकडे,विस्ताराकडे पाहून हे परकीय लोकही आश्चर्याने तोंडात बोटे घालतात त्या किल्ल्याची खरी ताकद कशात असेल तर त्याच्या देवदुर्लभ दुर्गमतेत.आंग्ल इतिहासकार डग्लस देखील एके ठिकाणी म्हणतो- शिवाजी महाराजांचे दुर्ग म्हणजे भारतातील त्यांच्या शत्रूंना धाक होता.
महाराष्ट्रातील किल्ले शत्रूंबरोबर लढले,पडले,ढासळले ,कोसळले आणि पुन्हा- पुन्हा ताठ मानेने उभे राहिले ते त्यांच्या दुर्गमतेच्या जोरावरच.दुर्गमता हिच इथल्या किल्ल्यांची खरी ताकद आणि ओळख.
महाराज स्वतःच एके ठिकाणी म्हणतात-आमच्या या कठीण प्रदेशात कल्पनेचा नुसता घोडा नाचवणे देखील कठीण मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्टच कशाला.
'दुर्गम इति दुर्ग' हेच इथल्या दुर्गांच्या यशाचे खरे सूत्र आहे हे देखील थोरले महाराजच आम्हाला सांगून गेले.
ज्या दुर्गांच्या दुर्गमपणांनी शत्रूंच्या मनातही वेळोवेळी धडकी भरवली त्या दुर्गांचा दुर्गमपणा पर्यटन आणि विकास या गोंडस नावांखाली हिरावून घेणे म्हणजे शिवविचारांशी प्रतारणा केल्यासारखेच नाही आहे का? महाराजांनी ज्या दुर्गनितीने हे गडकोट जोपासले त्या दुर्गनितीलाच खिंडार पाडून किल्ल्यांवर हव्या त्या गोष्टी करण्याचा अधिकार आपल्याला खरच आहे का?
राजगड किल्ला तर शिवविचारांचा आणि महाराष्ट्राला लाभलेल्या दुर्गसंपत्तीचा खराखुरा आत्मा आहे .महाराजांच्या विचारांशी प्रतारणा करून त्यांच्या आवडत्या राजगडाच्या दुर्गमपणाला हात घालण्याच पाप 'दुर्गांचा देश' म्हणविणा-या महाराष्ट्र भुमित तर न झालेलेच बरे आहे.
आपले दुर्ग एवढे दुर्गम का होते व महाबलाढ्य शत्रूही त्यांच्या दुर्गमत्वाची एवढी स्तुती का करत होते हे जर नव्या पिढीपर्यंत योग्य रित्या पोहचवायचे असेल तर दुर्ग आहे तसेच जोपासणे व दुर्गम म्हणूनच नव्या पिढीला दाखवणे कधीही योग्य राहील..नाहीतर रोपवेत बसून राजगडावर पोहचणा-या आमच्या नव्या पिढीला 'दुर्गम इति दुर्ग ' म्हणवणारे महाराज कसे बरे समजतील..?
खाफीखान,मुस्तैदखानाच्या राजगडाविषयीच्या भितिला देखील भविष्यात काल्पनिक आणि अनाठायी ठरवले गेल्यास नवल वाटायला नको.
( सिंहगडावर जायला एवढी सोपी वाट असताना तानाजी मालुसरे एवढ्या अवघड जागेतून गड का चढले ..हा गड तर जिंकायला किती सोप्पा आहे .. ?
गाडीमार्गाने गडावर जाणा-या लहान मुलांना पडलेले असे बाळबोध प्रश्न मी अनेकदा ऐकलेले आहेत.)
सिंहगड,प्रतापगड,रायगड,प्रचंडगडा सारख्या महत्वपूर्ण पण आपला दुर्गमपणा हरवून बसलेल्या किल्ल्यांच्या पंक्तीत गडांच्या या राजाची वर्णी लागू नये एवढीच इच्छा.कारण महाराष्ट्राला लाभलेल्या दुर्गसंपत्तीत तो एकमेवाद्वितीय आणि अनमोल असा आहे.त्याला जोपासण हे आपलं कर्तव्य आहे ना की त्याच्या समस्येत भर घालणं.
राजगडावर सध्या खरच काही करण्याची गरज असेल तर ती त्याच्या तटाबुरूजांना सावरण्याची.गेली कित्येक वर्षे स्वराज्याची राजधानी असलेल्या या गडाकडे सर्वांचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे.महाराजांची जिवंत सावली असलेला हा गड राजांच्या विचारांतूनच जेवढा आम्ही जोपासू तेवढीच आणि तीच खरी शिवविचारांना मानवंदना असेल.रोपवेचा खुळचट विचार महाराजांच्या या राजदुर्गाला केवळ आणि केवळ यातना देणाराच ठरेल.
गडसर्वांना पाहता यावा हा विचार जरी चांगला असेल तरी रोपवे हा त्याला पर्याय असू शकत नाही .जर खरच गडावर काही करायचे असल्यास राजगडावर येणा-या वाटांपैकी पाली दरवाजा व चोर दरवाजाच्या वाटेवर आवश्यक व अवघड ठिकाणी गडाला साजेशा अशा दगडी पाय-या नक्कीच बांधता येऊ शकतात. जेणेकरून घसरड्या वाटांवरून चढण्याचा त्रास असलेल्यांना ,लहानांना,वयस्करांना गड चढाई सुलभ होऊ शकेल.
दुसरी गोष्ट पाली दरवाजा आणि चोर दरवाजा मार्गावर गर्दी होते म्हणून रोपवेचा पर्याय पुढे आल्याचे सांगितले जात आहे .या समस्येवर खरेच तोडगा काढायचा असल्यास गुंजवणे दरवाजा ची वाट तिथल्या वृक्षसंपदेची व गडाची हानी न करता वापरात आणणे व तो मार्ग पाली दरवाजा प्रमाणे गढचढाईस योग्य करने हाच एकमेव पर्याय गडाच्या दृष्टीने योग्य आणि फायदेशीर असू शकतो. अर्थात हे ही आवश्यक असल्यासच.
शिवविचारांना व गडाला अनुसरून अशा ब-याच गोष्टी राजगडावर करता येऊ शकतात.परंतू रोपवेचे खूळ राजगडाला न चिकटलेलेच बरे.नाहीतर महाराजांच्या 'दुर्गम दुर्ग 'विचारांतल हे शेवटच दुर्गपुष्प देखील आपल्या हातून गेलेलं असेल.
पर्यटनाला चालना द्यायला आणि हौसे-मौजेचे पाळणे बांधून मजा-मस्ती करायला महाराष्ट्रात महाबळेश्वर-माथेरान सारखी असंख्य पर्यटन स्थळे आहेतच की.ज्या ठिकाणी असे असंख्य पाळणे बांधून पर्यटनाची योग्य भरभराट करता येऊ शकते.परंतू किल्ले ,रोपवे आणि गाडीरस्ते हे चुकीचे समीकरण राजकारण्यांच्या 'किल्ले संवर्धन यादीतून' कायमचे बादच करायला हवे.तरच किल्ले योग्यरीत्या जोपासले जातील अन्यथा भविष्यात किल्ल्यांचे महाबळेश्वर-माथेरान व्हायला वेळ लागणार नाही.
किल्ल्यांना खरी गरज आहे ती 'संवर्धनाची' ना की 'अनावश्यक पर्यटन वाढीची'
पोस्ट साभार - श्री. अमित निंबाळकर यांच्या फेसबुक वॉलवरून