Markom GOTi - Political

Markom GOTi - Political Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Markom GOTi - Political, Advertising agency, Thane.

शिक्षणाचा फार्स काही केल्या संपेना नेहमी आपल्या लेखाला आपण मराठी साहित्यातील आनंदयात्री म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या पु....
01/10/2024

शिक्षणाचा फार्स काही केल्या संपेना

नेहमी आपल्या लेखाला आपण मराठी साहित्यातील आनंदयात्री म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या पु.लं. देशपांडे यांच्या साहित्यातील एका प्रसंगावरून करतो. आज तसाच एक मजेदार प्रसंग. प्रसंग आहे असा मी असामी मधला. धोंडोपंतांचा मुलगा शंकऱ्या आपल्या शाळेतलं प्रगती पुस्तक आणून त्यांच्या समोर अतिशय कोडगेपणाने सही करून द्या ना, असं म्हणत उभा आहे आणि त्याच्यावर धड वैतागताही न येणारे धोंडोपंत हताशपणे त्याच्या शाळेच्या पुस्तकातील संत तुकारामांच्या अभंगावरचा धडा वाचत आहेत. जबरदस्त प्रसंग आहे तो. त्या अभंगाखाली स्वाध्याय म्हणून दिलेले सर्व आपण वाचले तर धोंडोपंतांसारखीच आपल्याला पण घेरी येते. पण यातून एक गोष्ट मात्र अगदीच उफाळून आल्यासारखी मनात येते की आपल्या सर्वांच्याच आयुष्यात हा प्रसंग एकदातरी येतोच येतो. त्यामुळे आपण खळखळून हसतो, पण नीट बघायला गेलं तर खरा प्रश्न तसाच राहिला आहे. त्यावर उत्तर अजून निघालंच नाही किंवा कोणी विचारच केला नाही. एक चांगलं उच्च शिक्षण घेऊन, नोकरी किंवा व्यवसायात स्थिर होण्याची स्वप्न उराशी बाळगून असलेला मध्यमवर्ग मात्र या शिक्षण व्यवस्थेच्या गोंधळात ससेहोलपट भोगत आहे. कोणीच यावर पुढे होऊन विचार करत नाही. अति श्रीमंत वर्गाला या प्रश्नाची काळजी करण्याची गरजच भासत नाही, कारण सर्वच सुख त्यांच्या समोर हात जोडून उभी असतात आणि अति गरीब लोकांना रोजच्या तोंडमिळवणीची चिंता त्यामुळे राहता राहिला तो मध्यमवर्ग आणि तोच शिक्षण व्यवस्था या प्रश्नाच्या केंद्रस्थानी येतो आणि सगळ्या गोष्टींची धग सहन करत राहतो. आज आरोग्य व्यवस्थेसारख्याच अतिशय दुर्लक्षित विषयाची चर्चा. शिक्षण व्यवस्थेची, त्याच्या प्रश्नांचा, उत्तरांचा उहापोह करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न.

भारतात शिक्षण व्यवस्था ही आरोग्यसेवे सारखीच अत्यंत दुर्लक्षित अशीच गोष्ट. अगदी बालवाडी पासूनच आपल्याकडे सर्व गोंधळाला सुरुवात होते. मुळात शिक्षण ही अत्यंत मूलभूत गरज. मुळात शिक्षण भविष्यात वेगवेगळी प्रगतीची शिखरे साध्य करण्यासाठी घ्यायचं असतं, पण इथे मात्र ते अनेक खासगी संस्थांच्या कमाईचे राखीव कुरण बनले आहे. आज बालवाडी पासूनच लाखांच्या घरात फी सुरु होतात. ते एवढे मोठाले आकडे ऐकले की आपलं संपूर्ण शिक्षण सुद्धा याच्या पेक्षा कमी पैश्यांमध्ये झालं हे झटकन लक्षात येतं. हा गोंधळ इथेच संपत नाही, इथून तर सुरुवात होते. शाळेच्या शिक्षणावर भागत नाही म्हणून मोठाल्या फी भरून ज्यादा क्लासेस लावावे लागतात. परत फक्त शाळेतलं शिक्षण घेऊन भागात नाही, मुलांच्या अंगात विविध कलागुण विकसित व्हावेत म्हणून त्यांना विविध स्पर्धांना घालावं लागतं. त्यांचा परत वेगळा खर्च. हे बालवाडी ते दहावी चालूच राहतं. त्यातून एवढं करून भागत नाही म्हणून मग पुढचे कॉलेजचे टेन्शन, मग करियर काय करणार याचं टेन्शन या सर्वच गोष्टी येतात. यात फक्त मध्यमवर्गाच भरडला जातोय का? सगळेच या चरख्यातून जात आहेत. पण उच्च उत्पन्न गटाला हे करताना सर्व संसाधने उपलब्ध असतात त्यामुळे ते सोपे जाते आणि गरीब वर्ग तर इथपर्यंत पोहोचूच शकत नाही म्हणून लांब राहतो. मग उरतो तो मध्यमवर्ग तो मात्र या सर्व पिळवणुकीतून पिळला जातो खूप. त्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे बघणं महत्वाचे ठरते.

आपल्याकडे कायमच बोंब होत असते की आपल्याकडच्या शिक्षणाचा आणि व्यवहारातील जगाचा काहीच संबंध नाही. त्यामुळे मुळातच आपण काय शिकलो म्हणजे आपल्याला चांगली नोकरी किंवा व्यवसाय करता येईल याची नीट माहितीच मिळत नाही. इंजिनीअरिंग, आयटी यांच्या सारख्या क्षेत्रांत गलेलठ्ठ पगाराच्या, परदेशी जायच्या संधी मिळतात म्हणून त्यांच्याकडे सर्वसामान्यपणे मध्यमवर्गीयांचा प्रचंड ओढा असतो, पण त्यातून ही अशी संधी किती जणांना मिळणार? जेवढे लोक दरवर्षी पदवी घेऊन बाहेर पडतात त्यांचं नक्की काय होतं ? याचा किती अभ्यास झाला आहे? आज मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये, त्यांच्या आजूबाजूच्या उपनगरांमध्ये शेकड्याने कॉलेज आहेत पण त्यातली हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच कॉलेजेस आहेत ज्यातील मुलांना या संधी मिळतात, बाकीच्यांचं नक्की काय होतं याची माहितीच कोणाला नसते. ही आज जवळपास सर्वच शाखांची स्थिती आहे. मुंबई- पुण्याकडे अशी अवस्था आहे तर बाकीच्या ठिकाणी काय होतंय याची कल्पनाच केलेली बरी. कोणालाच याबद्दल फरक पडत नाही आणि सरकार पातळीवरही याबद्दल आश्चर्यकारक उदासीनता आहे.

एकंदरीतच शिक्षण या बाबतीत प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे, पूर्वी कधीकाळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात मोठी जगप्रसिद्ध विद्यापीठे होती. तिकडे शिकायला परदेशातून सुद्धा लोक येत होते. पण आज त्याच भारतातील शिक्षण क्षेत्राची अवस्था फारच बिकट होत चालली आहे. नक्की यावर उत्तर शोधायचं कसं हा प्रश्नच आहे पण प्रयत्न जरूर करू पुढील भागात यावरील उत्तरांची चर्चा.

तूर्तास इतकंच पुरे.....

सरकारी आरोग्यव्यवस्था आणि मध्यमवर्गीय उदासीनता..पुलं देशपांडे हे एक असे लेखक होते की त्यांनी मध्यमवर्गीय जीवनातील प्रत्य...
14/09/2024

सरकारी आरोग्यव्यवस्था आणि मध्यमवर्गीय उदासीनता..

पुलं देशपांडे हे एक असे लेखक होते की त्यांनी मध्यमवर्गीय जीवनातील प्रत्येक गंभीर पैलूंवर अतिशय विनोदी भाष्य केले आणि हसत हसत सर्व मध्यमवर्गच नव्हे तर राजकीय व्यवस्थेलाही फटकारे मारले. म्हणूनच आपल्याही लेखांमध्ये आपण त्यांचीच रूपके वापरतो. त्यातलंच एक रूपक घेऊन आजच्या लेखाला सुरुवात करू. मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर यामध्ये त्यांनी अस्सल पुणेरी दुकानदाराचे एक लक्षण सांगितले आहे, या अशा माणसाच्या दुकानात सर्वात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू म्हणजे गिऱ्हाईक. पुणेरी दुकानदाराची गिऱ्हाईकांबरोबर जी वागणूक तीच आपल्या सरकारची दोन अत्यंत मूलभूत गोष्टींबद्दल वागणूक दिसते त्या म्हणजे शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था. शिक्षण व्यवस्थेबद्दल आपण पुढच्या काही लेखांमध्ये बोलूच पण आजचा विषय आरोग्याचा. आपल्या सरकारच्या लेखी, आरोग्य व्यवस्था ही अत्यंत दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू आहे. मुळात सरकार असं का करत आहे ? हा वेगळा संशोधनाचा विषय आहे. सरकार आणि सरकारी आरोग्य व्यवस्था हि खरी तर सामान्य माणसाची हक्काची जीवनवाहिनी असायला हवी, पण सरकारच नव्हे तर सर्वच आणि प्रामुख्याने मध्यमवर्गीय नागरिकांची या व्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कायमच पूर्वग्रहदूषितच राहिला आहे. असं का झालं आणि खरंच या दुष्टचक्रातून सुटण्यासाठी काहीच उपाय नाहीत का? या सर्वांची चर्चा करणारा आजचा लेख.

मुळात इथे सरकार हा घटक महत्वाचा का आहे ? हे स्पष्ट करतो. सरकार ही अशी एकमेव यंत्रणा आहे की जी समाजातील सर्व थरांतील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या सर्व मूलभूत गरजा, त्यांना परवडतील अशा किमंतीमध्ये भागवू शकते, मुळात सरकार नावाची यंत्रणा तयारच यासाठी झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळेच सर्वच नागरिकांना किमान कींमतीमध्ये चांगली आरोग्यसेवा पुरवण्याचे काम आपसूकच सरकार नावाच्या यंत्रणेकडे येते. पण ही जबाबदारी सरकार पूर्ण करत आहे का ? हा प्रश्न विचारला तर याचं उत्तर सपशेल नाही असंच येईल. अगदी लांब कशाला यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारची आरोग्य व्यवस्थेवरची गुंतवणूक ही फक्त १.९% इतकीच आहे, जी खरंतर किमान ३ ते ४ टक्क्यांवर असायला हवी. महाराष्ट्राची गत काही वेगळी नाही, महाराष्ट्र राज्याची आरोग्यवरील गुंतवणूक ४.६ टक्के इतकी आहे जी वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार किमान ८ टक्के असायला हवी. यावरून आपल्याला लक्षात येईल की सरकारकडून आरोग्यव्यवस्थेसाठी अतिशय अपुरी गुंतवणूक केली जात आहे. याचाच परिणाम मग आपल्याकडे अपुरी सरकारी हॉस्पिटल्स, अतिशय कमी डॉक्टरांची संख्या, बाकीच्या स्टाफची कमतरता, त्यामुळे त्या सरकारी रुग्णालयांत आपल्याला सगळ्यांचीच वानवा दिसते. क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण आल्यामुळे जमेल आणि जागा मिळेल तिथे रुग्णांसाठी बेड्स टाकले जातात ज्यामुळे हॉस्पिटल्स वरचा ताण वाढतो, मग दगावणारे रुग्ण , यांमुळे हॉस्पिटल्स मध्ये डॉक्टरांवर होणारे वाढते हल्ले, हे सगळंच दुष्टचक्र उभं राहतं. मुंबई, ठाणे सारख्या महानगरी ही अवस्था तर बाकीच्या महाराष्ट्राची तर कल्पनाच केलेली बरी. यातून मार्ग निघणार कसा? हे एखादं कोडं बनून राहिलं आहे.

यात आता मध्यमवर्गाबद्दल बोलू. मुळात या संपूर्ण वर्गाचे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे नाते तुटल्याला बरीच वर्षे झाली. याची कारणे शोधायची तर वर दिलेली सर्वच कारणे त्यात घेता येतीलच पण त्याहून अधिक म्हणजे या आरोग्य व्यवस्थेविषयी असलेलं अत्यंत अविश्वासाचे वातावरण हे त्याचे सर्वात प्रमुख कारण आहे. कुठल्याही सरकारी हॉस्पिटल मध्ये गेल्यावर तिथे वशिल्याशिवाय काम होतच नाही हा सर्वसाधारण समज आहे. त्यामुळे कुठल्याही आजारावर उपचार घेण्यासाठी गेल्यावर तिकडे मिळणारी वागणूक अतिशय संतापजनक असते. त्यामुळे मध्यमवर्गीयांचा ओढा हा खिशाला परवडत नसून सुद्धा खासगी हॉस्पिटल कडे जास्त राहतो. आरोग्य सेवेतील विषमता दूर करण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. उदा. महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारत यांसारख्या योजना. यांची व्याप्ती वाढून आता सर्वच नागरिक या योजनेच्या कक्षेत आले आहेत. ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा यांमध्ये देण्याची सुविधा आहे, पण या योजनांबद्दल किती लोकांना माहिती आहे ? हा प्रश्न विचारला तर हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच लोक मिळतील. अशी अवस्था आहे. यांमध्ये मध्यमवर्गीयांची देखील चूक आहे. ती अशी की बरेच जण या सेवांचा लाभ घेणे कमीपणाचे मानतात किंवा परिस्थितीच अशी आहे की त्यांचा तसा समज होतो पण हे सारे समज- गैरसमज दूर करून मध्यमवर्गीयांनी पण या सर्वांकडे चांगल्या दृष्टीने बघायला हवे. तरच ही व्यवस्था परत उभारी घेऊ शकेल.

एकूणच या आरोग्य व्यवस्था आघाडीवर सर्वच आनंदीआनंद आहे. मुळात ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असूनही याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. अलीकडेच एक बातमी वाचली की आता फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाच मोडीत निघाली आहे. ही अतिशय भयावह गोष्ट आहे, कारण उत्तम आरोग्य सेवा पुरविण्याच्या साखळीतला एक महत्वाचा दुवाच यामुळे संपुष्टात येतो आहे. यावर सरकारने लक्ष केंद्रित करून आवश्यक तेवढी गुंतवणूक वाढविणे गरजेचे आहे. सध्या या सर्वाला उपाय म्हणून मुंबईत बाळासाहेब ठाकरे दवाखाना सारख्या योजना सुरू आहेत पण त्याची व्याप्ती वाढायला हवी. सामाजिक दायित्व निधी सारख्या गोष्टींचाही उपयोग करून घ्यायला हवा. कुठलाही राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून यावर काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनीही याकडे गंभीरपणे बघितले पाहिजे. तरच या कोंडीतून आपली सुटका होऊ शकते. हीच काळाची गरज आहे.

तूर्तास इतकंच पुरे…..

मध्यमवर्ग आणि कणा तुटलेली आरोग्य व्यवस्था…  पुलं देशपांडे यांच्या मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर मध्ये एक छान वाक्य आहे. मु...
03/09/2024

मध्यमवर्ग आणि कणा तुटलेली आरोग्य व्यवस्था…

पुलं देशपांडे यांच्या मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर मध्ये एक छान वाक्य आहे. मुंबई राहायला मुंबईचा अभिमान बाळगला पाहिजेच असं नाही. मुंबईला कोणी एक भिकार म्हटलं की आपण सात भिकार म्हणून मोकळं व्हावं. हे वाक्य आजही किती समर्पक आहे. ज्याला अक्षरशः भिकार म्हणता येईल अशा कितीतरी गोष्टी या मुंबई मध्ये बघायला मिळतील. त्यातील काही गोष्टी आपण या आधीच्या लेखांमध्ये बघितल्या आहेत. त्याच मालिकेतील पण खरी तर अतिशय गंभीर अशी गोष्ट म्हणजे मुंबईची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था. खरंतर असा सर्वमान्य गैरसमज आहे की सामान्य मध्यमवर्गीय मुंबईकराला या विषयाबद्दल काहीच देणंघेणं नाही, पण नीट सूक्ष्मपणे विचार केला तर हे किती निखालस खोटे आहे ते आपल्याला कळून येईल. या सर्वाची काही कारणं आहेत. काही गंभीर आहेत आणि कशी अगदीच फुटकळ आहेत. पण तरीही हा विषय दुर्लक्ष करण्यासारखा नाही. कारण ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ज्या प्रकारे मान टाकत आहे आणि तिला ऊर्जितावस्था येण्यासाठी कोणीच पुढे येत नाही हे एक प्रकारे संशयाला जन्म देते. खरंच हे काय प्रकरण आहे ते समजून घेण्यासाठी याच्या मुळाशी जायला हवे आणि परत हे कार्य एक मध्यमवर्गीय म्हणून आपल्यालाच करायचे आहे. यातूनच काहीतरी घडू शकेल आणि या विषयावर झोपेचे सोंग घेतलेल्या राजकीय व्यवस्थेला जाग येऊ शकेल. आज याच सर्व विषयांची चर्चा करण्याचा छोटासा प्रयत्न.

खरेतर अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजांबरोवर आरोग्य ही तितकीच महत्वाची गरज आहे हे त्यावेळी आपल्यावर राज्य करणाऱ्या इंग्रज सरकारने ओळखले होते, त्यामुळेच लोकांना आधुनिक आणि चांगले उपचार देण्यासाठी 1845 मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलची स्थापना केली. पुढे जशी जशी गरज वाढत गेली तसा त्याचा विस्तार होऊन आजचे जेजे हॉस्पिटल तयार झाले. नंतर एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आलेल्या प्लेगच्या साथीने घातलेल्या थैमाना नंतर तर या अशा प्रकारच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची गरज अधोरेखित झाली. त्यातूनच हाफकिन इन्स्टिट्यूट, केइएम हॉस्पिटल यांसारखी रुग्णालये उभी राहिली. मुंबईचा आकार जसा वाढत गेला तसे ही हॉस्पिटल्सची संख्या वाढायला लागली. स्वातंत्र्यानंतरही आपण या क्षेत्रात काम केलेच नाही असे नाही, घाटकोपरचे राजावाडी हॉस्पिटल, सांताक्रूझचे व्ही.एन. देसाई हॉस्पिटल ही त्याचीच उदाहरणे. जो पर्यंत मुंबईची वाढ आटोक्यात होती तोपर्यंत या व्यवस्थेवर सर्वांचे भागात होते. पण नंतरच्या काळात या कडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे याच आरोग्य सेवेने धापा टाकायला सुरुवात केली. एकीकडे वाढणारी मुंबईची गर्दी आणि आरोग्य व्यवस्था यांचा कुठेच ताळमेळ नाही अशीच स्थिती झाली. जशी मुंबई वाढली तशी त्यांच्यासाठी असलेली आरोग्य व्यवस्था पण वाढली, पण तिथली, स्वच्छता, वेळेत न मिळणारे उपचार, भ्रष्टाचार यांमुळे तिथे कोणी शहाणा माणूस जाणेच टाळू लागला. या सर्वच गोष्टींची परिणीती सरकारी हॉस्पिटल मध्ये जाववत नाही आणि खासगी हॉस्पिटलचे बिल परवडत नाही त्यामुळे फक्त फरफट होण्यातच झाली आहे.

मुळात आपल्याकडे आरोग्य व्यवस्था हाच मुळात ऑप्शनला टाकलेला विषय असल्यामुळे, लोकांचे आरोग्य आणि त्यासाठी काहीतरी व्यवस्था करावी लागते हे सर्वपक्षीय सरकारांच्या आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या प्रशासन व्यवस्थेच्या गावीच नसतं. त्यामुळे अतिशय वाईट अवस्थेतील बांधकामे, क्षमतेपेक्षा जास्त पेशंट, त्यांना पुरेशी औषधे नसणं, या सगळ्याचा ताण येऊन पेशंटवरच खेकसणारे डॉक्टर्स, डॉक्टर्सच्या ओपीडी बाहेर उसळलेली गर्दी हेच चित्र सगळीकडे दिसतं. खरंतर याच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या जीवावर आपण कित्येक जीवघेण्या साथींवर मात केली आहे. सर्वात पहिले आलेली प्लेगची साथ, त्यानंतर 1920ची इन्फ्ल्यूंझाची साथ असो आपण याच व्यवस्थेच्या बळावर यावर मात केली आहे. स्वातंत्र्यानंतरही यात खंड पडला नाही. याचे सर्वात यशस्वी उदाहरण म्हणजे पल्स पोलिओ मोहीम. याहूनही महत्वाचे म्हणजे आताची कोरोना लसीकरण मोहीम हीसुद्धा याच व्यवस्थेच्या जोरावरच यशस्वी झाली आहे. तरी सुद्धा एक प्रश्न पडतोच सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या पाठीचा कणा असलेली ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्था इतकी खंगली कशी आणि यातून तिला बाहेर पडण्याचा काहीच मार्ग शोधता येणार नाही का ? राजकारण, राजकीय फायदे - तोटे सर्वच बाजूला ठेवून याची चर्चा करायला हवी. एकाच भागात हे पूर्ण होणार नाही, पुढच्या भागात यावरील उपायांची चर्चा करुया.

तूर्तास इतकंच पुरे. ….

सार्वजनिक उत्सव आणि अलिप्त मध्यमवर्ग.. आज गोकुळाष्टमी. हा दिवस म्हटला की, अगदी नुकत्याच जन्मलेल्या श्रीकृष्णाला टोपलीत घ...
27/08/2024

सार्वजनिक उत्सव आणि अलिप्त मध्यमवर्ग..

आज गोकुळाष्टमी. हा दिवस म्हटला की, अगदी नुकत्याच जन्मलेल्या श्रीकृष्णाला टोपलीत घालून, खवळलेली यमुना पार करत जाणारा वसुदेवाची गोष्ट आणि रात्री बारा वाजता डोळ्यावरची झोप कटाक्षाने बाजूला सारत, कृष्ण जन्माचा सुंठवडा खायची वाट बघणारी पोरं हे हमखास चित्र असायचं. अगदी परवा - परवा पर्यंत अशाच सोहळ्यात रंगलेली माणसं दिसायची. दुसऱ्या दिवशी आजूबाजूची छोटी मंडळी जमवून होणारी छोटेखानी दहीहंडी संपला उत्सव. मध्यमवर्गीय माणसाच्या धकाधकीच्या आयुष्यात येणारे हेच ते छोटे सुखाचे क्षण. पण आता तसं राहिलेलं नाही. आता कुठलाही सण म्हटला की त्यात अत्यंत चित्र- विचित्र आरडा- ओरड करत, किंचाळत जाणारे दारुडे, कुठल्याही दादा - मामांच्या आगेमागे करणारे आडदांड कार्यकर्ते, नवसाला पावणाऱ्या गल्लोगलीच्या राजांच्या पुढ्यात डोकं आपटून भाविक नावाच्या श्रद्धाळूंना हाकलणारे मंडळाचेच खास कार्यकर्ते आणि वर रंगणारे राजकीय कलगीतुरे आणि जीवघेणी स्पर्धा. सगळेच जण यातच मश्गुल आहेत. या सर्व दणदणाटात या सर्वांचा मूळ कर्ता पुरुष मध्यमवर्ग मात्र हरवत चालला आहे. कधी कधी प्रश्न पडतो या वर्गाचं या सगळ्यावर नेमकं म्हणणं तरी काय आहे? त्याचा या सगळ्याला खरंच पाठिंबा आहे का ? की विरोध? नक्की चित्र आहे तरी काय? याच सगळ्याचा उहापोह करणारा आजचा लेख.

अगदी आजच्या दहीहंडी पासूनच सुरुवात करू. पूर्वी घरगुती, बिल्डिंग, आळी, गल्ल्यांमध्ये घरगुती स्वरूपात साजरा होणार हा सण, राजकारण्यांची गरज म्हणून रस्त्यावर, चौकाचौकांत आला. गावा- गावांमधून गोविंदा पथकं उभी राहिली, मोठ्या जल्लोषात हा सण साजरा व्हायला लागला. पण हे चित्र काहीच वर्षांत बदललं. पूर्वी असलेल्या उत्साहाची जागा आता ईर्ष्येने आणि राजकारण्यांच्या दौलतजादाने घेतली. प्रत्येक जण मोठ्या - मोठ्या थरांच्या हंड्या लावायला लागला. डीजे, आचकट -विचकट नाच गाण्यांचा धुमाकूळ, त्यात कुठलीही सामाजिक मर्यादा न पाळणाऱ्या आंबट - शौकिनांचा सुळसुळाट जास्तच व्हायला लागला. एका अतिशय आनंददायी घरगुती सणाचे अत्यंत कर्कश्य राजकीय स्पर्धेच्या इव्हेंटबाजीत झालेले रूपांतर खरंच पचनी पडणारे नाही. जल्लोष, उत्साह हवा पण त्यालाही काहीतरी मर्यादा हवी. यामुळेच या दिवशीची मजा लुटण्यासाठी सहकुटुंब बाहेर पडण्याची हिंमत कुठला मध्यमवर्गीय माणूस दाखवेल? हा प्रश्नच कोणाला भेडसावत नाही का?

जी गोष्ट गोकुळाष्टमीची तीच गणेशोत्सवाची. या उत्सवाला धार्मिकतेची, सामाजिकतेची आणि राष्ट्रीयत्वाची एक छान किनार आहे. या उत्सवाचे लोभस रूप, उत्साहाने फुललेल्या बाजारपेठा, घरोघरी गणरायाच्या आगमनाने ओसंडून वाहणारा उत्साह, हे सर्वच विलक्षण असते. त्यामुळे हा उत्सव कुठल्याही मध्यमवर्गीयासाठी मर्मबंधातली ठेव आहे. पण यालाही तद्दन बाजारू पणाची कीड लागलीच. गल्लोगल्ली उभे राहणारे, नवसाला पावणारे गणपती, त्यांचे उभे राहणारे प्रचंड आणि रस्त्यांची चाळण करणारे मंडप, हे सगळंच वात आणतं. देवाच्या दर्शनासाठी तासनतास रांगेत उभं राहण्याची कसरत करत जाणारे भाविक, दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर काहीतरी चुकल्यासारखे बाहेर पडतात हे चित्र नक्कीच सुखावह नाही. बाकी मंडळाचे कार्यकर्ते, तिथे चालणारी राजकारण्यांची, मोठ-मोठ्या तारांकित लोकांची गडबड आणि त्यांच्यासाठी इतरांना हाकलून लावत त्या ताऱ्यांच्या पुढे -मागे करणारे आशाळभूत कार्यकतें यांच्याबद्दल तर बोलायलाच नको.

या सगळ्याचा खरोखरच उबग येण्या इतकं हे कर्कश झालं आहे. यामुळेच कदाचित सामान्य मध्यमवर्गीय माणूस यापासून अलिप्त राहायला लागला आहे. उत्सव , जल्लोष, ढोल - ताशे, डीजे, उत्साह हवा पण त्याला काहीतरी मर्यादांचं भान हवंच. याची साधी दखलही घ्यावीशी कोणाला वाटत नाही, त्यामुळेच मध्यमवर्गीयांची ही अलिप्तता लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या मतदानापासूनही अलिप्त राहण्यापर्यंत पोहोचली आहे. यावर वेळीच तोडगा शोधायला हवा आणि तो समाजानेच शोधायला हवा तरच पुढील वाटचाल सुखकर होऊ शकते.

तूर्तास इतकंच पुरे.....

#गणेशोत्सव

स्पिरीट ऑफ मुंबई, की एक उसनं अवसान? पूर्वी कोकणातील रस्त्याने, एसटी महामंडळाचा प्रवास घडला की त्या चिकाटीच्या जोरावर माण...
14/08/2024

स्पिरीट ऑफ मुंबई, की एक उसनं अवसान?

पूर्वी कोकणातील रस्त्याने, एसटी महामंडळाचा प्रवास घडला की त्या चिकाटीच्या जोरावर माणसाने पृथ्वी प्रदक्षिणा करून यावी असं म्हटलं जायचं. आता याच वाक्यात एसटीच्या जागी आपली लोकल घ्यायला हवी. मुंबई, ठाणे, वसई, विरार ते पार कर्जत -कसारा पर्यंतच्या सर्वच नागरिकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग, ही लोकल सेवा बनली आहे. पुलं देशपांडेंच्याच भाषेत सांगायचं तर मुंबईकराला शिवाजी महाराजांच्या घोडीचा स्पीड काय होता या पेक्षा, सकाळच्या फास्ट लोकल्स कुठल्या ही माहिती अधिक महत्वाची, कारण ते लोकलचं घड्याळ त्याच्या नशिबाला बांधलेलं असतं . या एवढ्या अवाढव्य पसरलेल्या महानगरांना आपल्या कवेत घेण्याची धडपड करणाऱ्या या लोकल सेवेची काय दमछाक होत असेल हे देवच जाणे. जणू काही बोलता येत नाही आणि सांगताही येत अशीच अवस्था. एकीकडे या लोकलसेवेवर ताण तर दुसरीकडे याला पर्याय म्हणून बघितल्या जाणाऱ्या सर्वच सार्वजनिक वाहतूक सेवांची लक्तरं वेशीवरच टांगलेली. दरवर्षी कोट्यवधी निधींचा पाऊस पडतो, नवीन नवीन प्रकल्पांच्या घोषणा होतात आणि नेमकी त्याचवेळी लोकल गोंधळामुळे नागरिकांचे हाल ही बातमी समोर येते. हे चित्र बदलावं असं कोणालाच वाटत नाही का? कुठल्याही राजकीय पक्षाला याचं उत्तर मिळालं तर त्यांच्यासाठी तो मोठा जॅकपॉट ठरेल. आज याच उत्तर शोधाची सुरुवात करण्याचा छोटासा प्रयत्न.

मुंबई आणि मुंबईची लोकल ही एक अजब कहाणी आहे. सकाळी साधारण ४ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत हाउसफुल्ल होऊन जाणाऱ्या गाड्या बघितल्या की अचंबित व्हायला होतं. सगळं शहरच जणू या लोकल ट्रॅकच्या माळेत गुंफल्यासारखं. एवढी महत्वाची गोष्ट ही. तरीही या लोकलचा प्रवास हा एखाद्या साहसी खेळाचा अविष्कार वाटावा असाच आहे. आताशा तर तो जास्तच जीवघेणा बनत चालला आहे. सकाळी कुठल्याही स्टेशन वर चक्कर मारली तर आपल्याला याचं दर्शन घडतं. आपल्या खांद्याला लावलेल्या बॅग्स सावरत दरवाज्याला लटकत जाणारे, या खेळातले साहसी वीर ऑलिम्पिक मध्ये भारताचा पदकांचा दुष्काळ संपवतील. रोज हजारो फेऱ्या सुरु असतात तरी गर्दी हटत नाही, आणि या सतत चालणाऱ्या चक्राला जरा जरी ब्रेक लागला तरी हे चित्र एकदम जीवघेण्या खेळात रूपांतरित होतं. वर आहेच पुन्हा मुंबई स्पिरिट नावाची फसवणूक. हा प्रवास इतका जीवघेणा बनत चालला आहे की जानेवारी २०२४ ते मार्च २०२४ या तीन महिन्यांच्या काळात तब्बल ५६५ लोकांनी रेल्वे अपघातात जीव गमावले आहेत. हे सगळं माहित असून, दिसत असून यंत्रणा कायमच ढिम्म राहते, दरवर्षी नवीन प्रकल्पांची घोषणा होते, किंवा आधीचे प्रकल्प पूर्ण होणार हे सांगितलं जातं, पण अजूनही या प्रश्नावरच्या उत्तराची गाडी स्टेशनातून हललीच नाहीये.

या सगळ्याला पर्याय म्हणून रस्त्यावरून जावं तर तिथे अजूनच वाईट परिस्थिती. आज मुंबई आणि आसपासची महानगरे एवढी अवाढव्य पसरली आहेत की त्या सगळ्यांना पुरेल अशी कुठलीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. या सगळ्यांमध्ये ताकदवान असणारी बेस्ट सेवाच धापा टाकत असेल तर इतरांची चर्चाच न केलेली बरी. खडखड वाजणाऱ्या, काळाकुट्ट धूर ओकणाऱ्या गाड्या, रस्त्यांवरचे खड्डे, त्यातच वर्षानुवर्षे चालू असणारे प्रकल्प, त्यामुळे होणार असह्य ट्रॅफिक यातून प्रवास करणे हाच एक मोठा गुन्हा झाल्यासारखं झालंय. हे कोणालाच कसं दिसत नाही हाच मोठा प्रश्न आहे. या सगळ्या कोंडीवर उपाय म्हणून मेट्रोकडे बघितलं जातं पण त्याची अवस्था अशी की एका पिढीत सुरु झालेलं बांधकाम पुढच्या पिढीत संपतं. जे वीस - बावीस वर्षांपूर्वी व्हायला पाहिजे होतं ते अजूनही झालंच नाहीये. मध्यंतरी आरे कारशेड साठी मोठं आंदोलन झालं, झाडं आपल्यासाठी महत्वाची आहेतच पण जर या मेट्रो सेवेमुळे लोकल गर्दीवरचा ताण कमी होणार असेल आणि त्यातून लोकल मधून पडून जाणारे असंख्य जीव वाचणार असतील तर ते तितकंच महत्वाचं नाही का? हा प्रश्न पडल्याशिवाय राहतंच नाही.

आपल्या मध्यमवर्गाच्या अपेक्षा काही फार नाहीत. नोकरीचे, व्यवसायाचे ठिकाण राहत्या घरापासून जवळच असावे. तिथून ये - जा करणे किमान सुसह्य व्हावे. बसचा, लोकलचा प्रवास किमान व्यवस्थित होईल इतपत तरी चांगला असावा. रस्त्यांवरचे खड्डे, पावसाळ्यात गटारं तुंबून भरणारे पाणी हे आणि या सारख्या अनेक प्रश्नांवर किमान वाजवी तोडगा निघावा. याहून सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्याही आपत्तीत, कुठलाच पर्याय शिल्लक नसल्यामुळे सुरु असलेलं या मध्यमवर्गीयांचे जीवन, याला स्पिरिट वगैरे म्हणून त्याचं उदात्तीकरण थांबवावं. बस्स, या एवढ्याच अपेक्षा आहेत. बघूया आता तरी कोणीतरी याची दखल घेतोय का ते? वाट बघूया.

तूर्तास इतकंच पुरे .....

मध्यमवर्गीय मतदार राजा जागा का होत नाही ? लोकशाहीमध्ये जागृत लोकशाहीला एक विशेष महत्व आहे. पुलंच्या बटाट्याच्या चाळीतील ...
01/08/2024

मध्यमवर्गीय मतदार राजा जागा का होत नाही ?

लोकशाहीमध्ये जागृत लोकशाहीला एक विशेष महत्व आहे. पुलंच्या बटाट्याच्या चाळीतील गच्चीच्या आंदोलनाने आलेल्या जागृततेसारखं, निवडणुका जवळ आल्या की लोकशाही अचानक जागृत झाल्यासारखी वाटते. घरोघरी, गल्लोगल्ली, शहरां -शहरांत, गावा - गावांत मतदान जास्तीत जास्त व्हावं म्हणून सुरू असलेल्या संपर्क मोहिमा दिसायला लागतात. झाडून सर्व राजकीय पक्ष फक्त याच एका गोष्टीसाठी एकमत होतात आणि पायाला भिंगरी लागल्यासारखे लोकांना भेटायला लागतात. सगळ्यांचा उद्देश एकच, मतदारांनी बाहेर पडलं पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे. तरीही एवढ्या सगळ्या अगदी वात आणे पर्यंत चाललेल्या मोहिमांनी सुद्धा मतदानाचा टक्का वाढतंच नाही, आणि तो प्रामुख्याने शहरांमध्येच वाढत नाही. असं का बरं होत असेल? मतदानासाठी म्हणून दिली गेलेली सुट्टी आणि नेमक्या त्याच्याच आदल्या दिवशी शहरातून बाहेर जाण्यासाठी लागलेल्या वाहनांच्या रांगा हे चित्र कधीच बदलत का नाही ? हे प्रश्न आपल्याला पडतंच नाहीत का ? आणि कुठल्याही राजकीय पक्षाला या प्रश्नाचं उत्तर शोधणं फायदेशीरच ठरणार आहे. त्याच उत्तर शोधाची ही आजची छोटीशी सुरुवात.

आपल्याकडे कुठल्याही छोट्या गावाचं शहरात रूपांतर व्हायला लागलं की अचानक जादूची कांडी फिरवल्यासारखं, त्या प्रदेशात बदल व्हायला लागतात. अचानक छोट्या टुमदार घरांची जागा, छोट्या- मोठ्या सोसायटी नामक ठोकळेबाज इमारती घ्यायला लागतात, अचानक जिथे गावात एकच छोटं रेशनिंगचं दुकान असायचं तिथे अचानक मोठी मोठी सुपर मार्केट्स दिसायला लागतात. गाव अचानक मॉडर्न व्हायला लागतं. यालाच आपण आजच्या भाषेत शहरं म्हणतो. या सर्व प्रक्रियेला एकंच कुठलातरी घटक कारणीभूत ठरलेला असतो. त्या गावाच्या जवळून रेल्वे गेलेली असते किंवा एखादा महामार्ग गेलेला असतो, अचानक त्या गावात एखादं पर्यटन स्थळ उभं राहायला लागतं, एखादी मोठी कंपनी तिकडे येते आणि आपलं बस्तान बसवते ह्या आणि अशा कित्येक गोष्टी या सो कॉल्ड शहरीकरणाला कारणीभूत ठरतात. या नव्याने तयार व्हायला लागलेल्या शहरांमध्ये राहायला येणाऱ्या लोकांची गर्दी जोरदार वाढायला लागते, काही दिवसांनी इतकी गर्दी होते की ते गावसुद्धा अपुरं पडायला लागतं आणि आसपासची गावं सुद्धा आपल्यात सामील करून घ्यायला लागतं. अशी ही गर्दी सतत वाढतंच राहते, आणि अचानक एके दिवशी लक्षात येतं की आपण एवढ्या लोकांना पुरेशा ठरतील अशा कुठल्याच सुविधा आपल्याकडे नाहीत, त्यामुळे आता फक्त बकालीकरण वाढायला लागलंय आणि तिकडे राहणाऱ्या लोकांचा आता पूर्णपणे भ्रमनिरास व्हायला लागला आहे.

या भ्रमनिरासाची अनेक कारणे असतात. अगदी घरातून बाहेर पडल्यावर समोरच दिसणारी उघडी गटारे, रस्त्यांवरचे खाच -खळगे, स्वतःच्या वाहनांनी जावं तर असणारा प्रचंड ट्रॅफिक, त्यातून घरातून नोकरीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा आणि तिकडून परत येण्यासाठी लागणारा प्रचंड वेळ, धूर, धूळ ह्या आणि अशा कित्येक गोष्टी या सर्वांना कारणीभूत असतात. मोठाल्या किंमती मोजून घरं विकत घ्यायची आणि तिथे नेमकी पाणी, वीज, रस्ते यांची असेलेली बोंब ही तर पाचवीलाच पुजलेली. यातून यांना सुटकाच नाही. आज जवळपास सर्वच शहरांची हीच अवस्था आहे. कोणीच काहीच बोलत नाही. मग हे सगळं सुधारणार कसं? या प्रश्नांवर कोण बोलणार ? हा प्रश्न कायमच अनुत्तरीत राहतो.

आपल्याकडे मतदान हे आपला आवाज उठवायचं एक शस्त्र मानलं जातं. पण मध्यम वर्ग मात्र आपल्या समस्या सुटण्याची गेली अनेक दशके वाटच पाहात आहे. मतदान प्रक्रियेबाबत या वर्गाचा भ्रमनिरास झाला आहे असेच सर्वसाधारण वातावरण आहे. त्यामुळेच मध्यम वर्गात मतदानाबाबत वाढती अनास्थाच दिसून येत आहे. या प्रश्नावर तोडगा काढणारा राजकीय पक्ष झपाट्याने वाढणार्‍या नागरी भागात उत्तम बस्तान बसवेल हे नक्की. पुढच्या भागात या वर्गाच्या आकांक्षांचा धांडोळा घेणं सुरूच राहील.

तूर्तास इतकंच पुरे

मध्यमवर्ग अल्लाउद्दीनचा जिनी...मध्यमवर्ग. कुठल्याही अर्थव्यवस्थेचा कणा. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्यातून नेटान...
27/07/2024

मध्यमवर्ग अल्लाउद्दीनचा जिनी...

मध्यमवर्ग. कुठल्याही अर्थव्यवस्थेचा कणा. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्यातून नेटाने, खंबीरपणे बाहेर पडून देशाला सावरणारा हा वर्ग. बरेचदा हा वर्ग तुम्हांला कुठल्याही मोर्चे, घोषणा, बंद, मोठमोठ्या रॅली यांमध्ये कधीच दिसणार नाही, पण असं अजिबात नाही की याला काहीच सामाजिक जाणीवच नाही किंवा याची काहीच राजकीय महत्त्वाकांक्षाच नाही. उलट या वर्गाची महत्वाकांक्षा आज पर्यंत कोणालाच समजली नाहीये. पु. ल. देशपांडे यांच्या असामी असा मी मधला धोंडोपंत या वर्गाचे मूर्तिमंत प्रतीक आहे.धोंडोपंत जसा कुठल्याही राजकीय पक्षाच्या सभेला जाऊन बसतो आणि स्वतःच मत न ठरवता आपल्या मताला नेमका कोण किंमत देतोय हे हेरण्याचा प्रयत्न करतो तसंच काहीसं हा वर्ग करतो. सर्वच घटनांचा, राजकीय, सामाजिक, आर्थिक सर्वच पातळ्यांवर घडणाऱ्या प्रत्येक बदलाचा मूक पण एक प्रभावशाली साक्षीदार म्हणजे मध्यमवर्ग. हा वर्ग थोडासा कोड्यातच टाकतो. प्रत्येक विचारवंतांना, तत्त्वज्ञानांना या वर्गाची नीट जाणीव करून घेणे थोडेसे अवघड झाल्याचं दिसून येतं कारण हा फार लवकर व्यक्त होत नाही, त्याला बोलतं करावं लागतं. पण हे करायचं कसं हे जगाच्या पाठीवर कोणालाच नीट जमलेलं दिसत नाही, अगदी भारतात सुद्धा. या वर्गाने एखाद्या विचारधारेला पाठिंबा देऊन आपलं मत त्या पारड्यात टाकणं किंवा न टाकणं हे सुद्धा भारतात सरकार उलथवायला कारणीभूत ठरलं आहे. तेव्हा याच एका जबरदस्त सुप्त शक्तिचा महासागर असणाऱ्या या वर्गाचा धांडोळा घेण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न.

मुळात मध्यमवर्ग म्हणजे नेमका कोण हाच एक गहन संशोधनाचा विषय आहे. जगात यावर खूप व्याख्या तयार झालेल्या मिळतील. पण आमच्या मते मध्यमवर्ग म्हणजे आज जी प्रगती झाली आहे ती पचवून उद्या यापुढे अजून काय साध्य करायचं आहे याचा सातत्याने विचार करत कृती करणारा वर्ग म्हणजे मध्यमवर्ग. आर्थिक स्तरावर यावर मतभिन्नता आढळेल, यात नेमका किती उत्पन्न मिळवणारा गट येतो यावर देखील मतमतांतर असेल, पण आज यातील एकही व्याख्या या संपूर्ण वर्गाचं चपखल वर्णन करू शकेल असं दिसत नाहीये. ढोबळ मानाने शहरांत राहणारा, ज्याच्याकडे मराठीत ज्याला आपण सुखवस्तू कुटुंब म्हणतो तशी जीवनशैली म्हणजे मध्यमवर्ग असं मानलं जातं, पण ही व्याख्या पुरेशी आहे का ? आमच्या मते नाही. कारण सुखवस्तूपणामध्ये एक प्रकारची स्थिरता असते, मध्यमवर्ग हा कधीच स्थिर नसतो. कायम उद्या काय हवं आहे याचा शोध घेत त्याच्या पूर्ततेसाठी कोण योग्य आहे ? याचा सातत्याने हा शोध घेत असतो. यात शहरांत असणारे छोटे दुकानदार ते सामान्य नोकरदार वर्गापर्यंत सगळेच या मध्यमवर्गात येतात.

या वर्गाच्या राजकीय महत्वाकांक्षा खूप सुप्त असतात, त्या वाढत्या आकांक्षांना पूर्ण करण्याची जबाबदारी जो उचलू शकेल त्या राजकीय विचारधारेला ते समर्थन देतात. याचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे २०१४ ची लोकसभा निवडणुक. मनमोहन सिंग सरकारला दुसऱ्या टर्म मध्ये याच विषयाला भिडायचं सामर्थ्य राहिलं नाही आणि त्याची परिणीती त्यांची सत्ता जाण्यात झाली. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकांत सुद्धा या वर्गाला उद्याची उज्ज्वल स्वप्न दाखवण्यात हे आताचे सरकार यशस्वी ठरले, पण नेमकं या २०२४ च्या निवडणुकांत याचा काहीतरी गोंधळ झाला आणि त्याची परिणीती म्हणजे आजची राजकीय स्थिती. भारतीय राजकारणावर या मध्यमवर्गाचा खूपच प्रभाव राहिला आहे. या सर्वाचा सांगोपांग अभ्यास होणं गरजेचं आहे.

या वर्गाची सर्वच विषयांवर ठाम मतं असतात. जातीयवाद, अर्थकारण, जागतिकीकरण, पर्यावरणवाद, राजकारण, धर्मनिष्ठा, शहरीकरण हे आणि आणखी अनेक विषय,या सर्वच विषयांवर या वर्गाची ठाम मतं असतात. या मतांना नेमकं किती महत्व मिळतं हा मुद्दा निराळा पण याकडे दुर्लक्ष करता येण्यासारखं नाही. म्हणूनच याला अल्लाउद्दिनचा जीनी म्हटलं आहे. याच वर्गाच्या या सर्व आकांक्षा, इच्छा, या वर्गाच्या प्रत्येक बाबतीत असलेल्या भूमिका याच सर्वांचा अभ्यास करण्याचं ठरवलं आहे. हा विषय खूप काही बोलण्याचा, खूप काही सांगण्याचा आहे. एकाच भागात संपेल असं नाही. तेव्हा आतापासून सुरुवात करुया. या सर्व प्रवासात आपली साथ असू द्या हीच नम्र विनंती.

तूर्तास इतकेच पुरे

Address

Thane
400602

Alerts

Be the first to know and let us send you an email when Markom GOTi - Political posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share